बांधकाम साहित्य महागल्याने लाभार्थ्यांची सरकारकडे मागणी
SINDEWAHI। 06 JANUARY 2024
ग्रामीण व शहरी भागातील गरजू गरीब नागरिकांना हक्काचे घर देण्यासाठी केंद्र सरकार घरकुल योजना राबवित आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ग्रामीण घरकुल बांधकामासाठी केवळ एक लाख वीस हजार रुपयाचे अनुदान दिले जाते. परंतू बांधकाम साहित्य महागल्याने लाभार्थ्यांना बांधकामासाठी आर्थिक भार सहन करावा लागत आहे.
त्यामुळे शहरी घरकुलाप्रमाणेच ग्रामीण भागातील घरकुलांना सुद्धा भरीव अनुदान द्यावे अशी मागणी आता ग्रामीण भागात जोर धरू लागली आहे.
सद्यस्थितीत नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरी भागात दोन लाख चाळीस हजार तर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागात एक लाख वीस हजार रुपये असे घरकुल बांधकामासाठी अनुदान दिले जाते. दिवसेंदिवस घरकुल बांधकामासाठी लागणाऱ्या विटा, रेती, सिमेंट, मजूरी आणि लोखंडाचे भाव गगनाला भिडत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील घराचे स्वप्न रंगविनाऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. एक लाख वीस हजार रुपयात दोन खोल्यांचे बांधकाम शक्य नाही. म्हणून सरकारने शहरी भागातील घरकुलांच्या लाभाप्रमाणेच दोन लाख वीस हजार रुपयाचे अनुदान ग्रामीण भागातील घरकुलांसाठी द्यावे. अशी लोकभावना आहे.