🐯मानव-वन्यजीव संघर्षाचे पडसाद - नागरिकांमध्ये प्रचंड भिती!
सिंदेवाही, दि. १६ डिसेंबर.
वनसंपदेने नटलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात पर्यटनाला चालना देण्याच्या हेतूने ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पात अनेक वाघ सोडण्यात आले. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची विक्रमी संख्या आहे. पर्यटन क्षेत्राचा विकास करतानाच मानव वन्यजीव संघर्ष टाळण्याच्या उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे परंतु वनविभागाच्या नाकर्तेपणामुळे मानव वन्यजीव संघर्षात मोठी जीवित हानी होत असून अनेकांचा नाहक बळी जात आहे. हिंस्त्र पशूंचे मानवी वस्तीत व शेतशिवारात दिवसाढवळ्या भ्रमण दिसून येते त्यामुळे शेतकरी, सामान्य नागरिक, प्रवासी, वाहतूकदार वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. एवढे सर्व घडत असतानाही वनविभागाकडून मात्र मानव जीवाचे मोल पैशात मोजण्यापलीकडे काहीच उपाय योजना करीत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. वनविभाने याची गंभीर दखल न घेतल्यास व वाघांचा तात्काळ बंदोबस्त न केल्यास प्रचंड जन आक्रोशाला सामोर जावे लागेल असा सज्जड इशाराच राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते, आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.
औद्योगिक जिल्हा म्हणून सर्व दूर परिचित असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याची दुसरी ओळख म्हणजे येथील घनदाट वने व आरक्षित ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्प ही होय. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून ताडोबा अंधारी या व्याघ्र प्रकल्पाला वन विभागाकडून मोठी चालना मिळत असली तरी मात्र मानव- वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वनविभाग सपेशल असमर्थ ठरत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दररोज हिंस्त्र पशुच्या हल्ल्यात नागरिक, शेतकरी, शाळकरी मुले, मजूर यांचा नाहक बळी जात असून वनविभाग मात्र कुंभकर्णी झोपेत असल्याचे जाणवते. जिल्ह्यातील वाहतूक मार्ग ,मानव वस्ती, वर्दळ ठिकाणी वन्यजीवांनी प्रचंड प्रमाणात दहशत माजवली. आज घडीला मानव - वन्यजीव संघर्षामुळे खरीप हंगाम आटोपताच रब्बी हंगामाचे नियोजन करणाऱ्या शेतकरी, शेतमजूर यांनी वाघांच्या वाढत्या हल्ल्यांच्या घटनांमुळे चक्क शेती व्यवसायाकडे भयभीत होऊन पाठ फिरवल्याने आणि सावली तालुक्यासह जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमधील शेतकऱ्यांची शेती पडीत राहण्याचे मार्गावर आहे. जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, सिंदेवाही, सावली, मुल व अन्य तालुक्यांमध्येही मानव वन्यजीव संघर्ष पेटला असून वन प्रशासन मात्र नागरिकांच्या नाहक जीवित बळींची नोंद करण्यापलीकडे काहीच करत नसल्याचे दिसुन येते. अशा भयावह स्थितीत ब्रह्मपुरी मतदार संघातील ब्रह्मपुरी सावली, सिंदेवाही आदी तालुक्यातील वनलगत ग्राम खेड्यांमध्ये सायंकाळ ते रात्रपाळी प्रवास करणे अत्यंत धोकादायक व जीवावर बेतणारा झाला असून ग्रामीण नागरिक दहशतीखाली जीवन जगत आहेत. मानव वन्यजीव संघर्षाच्या वाढत्या घटना पाहता पेटून उठण्याची गरज असून वन्य जीवांचे रक्षण झालेच पाहिजे यात कुठलेही दुमत नसून मानव वन्य- जीव संघर्षामुळे होत असलेली जीवित हानी टाळण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून नरभक्षक वाघांना जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावणे, वन कर्मचारी ग्रस्त, गावातील युवा तरुणांना गस्ती कामावर घेऊन मोठ्या प्रमाणात गस्त लावणे, गावा लगती झाडे सफाई, ट्रॅप कॅमेरे बसविणे, गावाशेजारी सोलर लाईट बसविणे, अशा विविध उपाययोजना करून वाघांचा तातडीने बंदोबस्त करा अन्यथा जिल्ह्यात यापुढे मानव वन्यजीव संघर्षात कुठलीही जीवित हानी झाली तर संबंधित वन विभागाच्या कार्यालयात मृतदेह ठेवून आंदोलन करणार असा सज्जड इशाराच आता राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.